सोमवार, ६ जून, २०११

समीप रंगमंच : Intimate Theater

कलानं ’समीप रंगमंच’चा तिसरा प्रयोग १५ मे ला सादर झाला. ’समीप रंगमंच’चे प्रयोग तुम्ही बघितले असतील, तर "पारंपारिक" नाटकापेक्षा त्यात असलेला वेगळेपणा तुम्ही अनुभवला असेल. समीप रंगमंच - किंवा Intimate Theater किंवा Theater In a Room - हा नाट्याविष्कार प्रेक्षक आणि कलाकार यांमधली अदृष्य भिंत दूर करतो, या दोघांमधलं अंतर कमी करतो. नाट्य प्रेक्षकांच्या समीप, प्रेक्षकांमधेच घडतं. समीप रंगमंचचा प्रयोग प्रेक्षकांना नाट्य जवळून अनुभवायची संधी देतो.

नाटकाच्या या जातकुळीबद्दल वाचा उदय कुलकर्णी यांनी लिहिलेल्या महाराष्ट्र टाइम्स मधे प्रकाशित झालेल्या या लेखात:

--
शोध नट-प्रेक्षकातील नात्याचा!

प्रचलित कमानी रंगमंचाच्या पलीकडे जाणाऱ्या प्रयोगशील नाटकांचा शोध घेणारं 'बियाँड प्रोसेनिअम - रिइमॅजिनिंग स्पेस फॉर परफॉर्मन्स' हे अनमोल वेलानी यांनी संपादित केलेलं पुस्तक इंडिया फाऊं डेशन फॉर द आर्टस् या संस्थेने प्रकाशित केलं आहे. त्यातील बादल सरकार यांच्या थर्ड थिएटरवर नेमका प्रकाश टाकणा-या अंजुम कट्याल यांच्या लेखाचा हा संक्षेप...
...........

शहरी रंगभूमीवर नाटकं सादर केली जातात, तेव्हा त्यात नटमंडळी आणि प्रेक्षक हे सरळ सरळ दोन वेगळे घटक असतात. ह्या दोन्ही घटकांचे अवकाश पूर्णपणे वेगळे असतात. नट ज्या भागात असतात, त्याला रंगमंच म्हटलं जातं, तो एका बाजूला असतो. ज्या खोल्यांतून वेशभूषेसह नट रंगमंचावर येतात, त्या खोल्या प्रेक्षकांना दिसणार नाहीत याची काळजी घेतलेली असते. रंगमंचाच्या समोर जो दुसरा भाग असतो, त्या जागेत प्रेक्षक बसतात, त्याला प्रेक्षागृह म्हटलं जातं. यात आसनांच्या रांगा असतात व त्या सर्व रंगमंचाच्या दिशेने तांेड करून असतात. यामुळे शेवटची रांग रंगमंचापासून बरीच दूर असते. नटमंडळी आणि प्रेक्षक ह्या दोन घटकांदरम्यान असणारा पहिला अडथळा म्हणजे त्यांचं परस्परांपासून लांब अंतरावर असणं. रंगमंच व प्रेक्षागृह वेगवेगळ्या उंचीवर असतात, ते समपातळीवर नसतात, हा दुसरा अडथळा. आणि तिसरा अडथळा असतो अंधाराचा. रंगमंचावर प्रकाश असतो तर प्रेक्षागृहात अंधार असतो. ह्या उजेड-अंधार फरकामुळे नटमंडळी व प्रेक्षक ह्या दोन घटकांमध्ये सर्वात जास्त दुरावा निर्माण होतो. नट असं भासवतात की, समोर कोणी बसलेलंच नाही. प्रेक्षक अंधाराच्या साहाय्याने लपून बसतात व तेही भासवतात की, ते तिथे उपस्थित नाहीत, रंगमंचावर जे सुरू आहे ते प्रत्यक्ष आयुष्यात घडतं आहे.

- बादल सरकार

बादलदांच्या या विचारातूनच दिसेल की, नट आणि प्रेक्षक यांच्यातील दुरावा त्यांना नको होता. त्यांना नट व प्रेक्षक यांच्यात थेट संवाद साधायचा होता. जगात प्रगत रंगभूमीवर काय घडतं आहे याचा त्यांनी अभ्यास केला आणि थर्ड थिएटरसाठी स्वत:ची तत्त्वं बनवली. अवकाश हा त्या विचारांमध्ये कळीचा मुद्दा होता. त्यांच्या कल्पनेत थर्ड थिएटरचे दोन प्रकार होते. एक 'आंगनमंच'. हे इंटिमेट थिएटरसारखं असेल. मोजक्या प्रेक्षकांच्या अगदी सान्निध्यात प्रयोग होईल. नट व प्रेक्षक समपातळीवर आणि सारख्याच उजेडात असतील. नटांना प्रेक्षकांच्या मागे, बाजूला जाता येईल, त्यांना स्पर्श करता येईल, त्यांच्याशी व्यक्तिगत संभाषण करता येईल. यात प्रेक्षक चारही बाजूला, अगदी मध्यभागीही बसतात आणि त्यांच्यामध्ये मोकळ्या असलेल्या भागात नाटक घडतं.

थर्ड थिएटरचा दुसरा प्रकार 'मुक्तमंच' किंवा 'माथेर नाटक'. इथे प्रेक्षकांबरोबर सामीप्य असणं, हा हेतू नसतो. मैदानात किंवा गावातील बाजारात, शाळेच्या पटांगणात, झोपडपट्टी भागातील मोकळ्या जागेत असं कुठेही ते नेलं जाऊ शकतं. अशा ठिकाणी दोन हजार-पाच हजारांचा जमाव सहज जमलेला असतो. यात नट आणि प्रेक्षक यांच्यात जवळिक साधणं शक्य नाही व ते अपेक्षितही नाही. पण त्याऐवजी इतर फायदे मिळतात. आंगनमंच प्रकारात नाटक जिथे सादर होणार आहे, तिथे प्रेक्षकांना आमंत्रित करावं लागतं. उलट मुक्तमंच प्रकारात जिथे प्रेक्षक उपस्थित आहेत तिथे नाटक नेलं जातं. यामुळे खूप जास्त प्रेक्षकांपर्यंत नाटक आणि त्याचा संदेश जातो. 'मिच्छिल' (मराठीतील 'जुलूस') या नाटकात त्यांनी या आपल्या संकल्पना प्रत्यक्षात आणल्या.

आंगनमंच प्रकारात 'मिच्छिल' सादर करताना त्यांनी ज्या प्रकारे प्रेक्षकांच्या बसण्याची व्यवस्था केली होती, ती त्यांनी त्याआधी 'स्पार्टाकस'चा प्रयोग करतानाही वापरली होती. एका प्रेक्षकाच्या 'स्पार्टाकस'च्या आठवणी लख्ख आहेत. तो म्हणाला, 'बंडाळीचा बीमोड झाल्यानंतर नट अरूंद मागिर्केतून रांगत पुढे सरकत. त्यांची तांेडं आमच्या गुडघ्यांना जवळपास स्पर्श करत असत आणि ते आमच्याकडे बघत कुजबुजत, 'आम्ही परत येऊ'...त्यांचं हे सान्निध्य तुमच्या जाणीवांवर आघात करतं. नट जणू त्या संकल्पनेचे वाहक बनतात. याप्रकाराने आम्ही रंगमंचाच्या अवकाशात ओढले गेलो.'

' मिच्छिल'ची सुरुवात घंटा वाजवून होते. प्रेक्षक असल्याप्रमाणे कोरस प्रवेश करतो, अॅक्टींग एरीयातून चहुकडे विखुरतो आणि बसण्यासाठी जागा शोधत आहोत, असं दाखवतो. घंटा वाजणं बंद होतं. लगेच सगळे दिवे बंद होतात. अंधारात कोलाहल ऐकू येतो. ते ब्लॅकआउटची कारणं काय असतील याची चर्चा करत आहेत, एकमेकांना सावध राहण्याची सूचना करत आहेत. अचानक एक प्राणांतिक किंकाळी ऐकू येते. कोरस, खून झाला असेल किंवा अपघात किंवा कोणाला भोसकलं असेल, याचा अंदाज करायला लागता. टॉर्च, काडेपेटी, लायटर काहीही लावून प्रकाश करा म्हणतो. कोरस गांेधळलेला आहे. अचानक एका पोलीस अधिकाऱ्याचा जरब बसवणारा आवाज ऐकू येतो, 'काय गांेधळ सुरू आहे?' अनेकजण उत्तरं देतात. कोणी सांगतं, किंकाळी ऐकू आली, कोणी सांगतं, कोणाचा तरी खून झाला, कोणी सांगतं, कोणाला तरी भोसकलं गेलं. अधिकारी हुकूम सोडतो, गप्प बसा. लगेच प्रकाश पडतो. लष्करी इतमामात उभा असलेला अधिकारी विचारतो, 'कोणाचा खून झाला?' कोरस शोध घेतं, पण प्रेत मिळत नाही. अधिकारी त्यांना, खोट्या अफवा पसरवू नका, असं दरडावत घरी जायला सांगतो. त्याच क्षणाला 'खोखा', एक तरूण नट - जो गुपचूप प्रेक्षकांमध्ये बसून आहे, लोळागोळा होऊन जमिनीवर पडतो.

यावरून दिसून येईल की नाटकाच्या सुरुवातीपासूनच नाटक सादर करण्याची जागा व प्रेक्षकांची जागा यात भेद केलेला नाही. प्रेक्षकांमध्येच राहून नट नाटक सादर करतात. प्रकाश व अंधार दोन्हीना, दोघांनाही सामोरं जावं लागतं आणि नट कोण आहेत व प्रेक्षक कोण, हे ओळखताही येत नाही.

या नाटकात कमीतकमी नेपथ्याचा वापर असल्याने अनेक नट मिळून शरीराचा वापर करून झाड, जंगल, रेल्वेचा डबा, बस असं सगळं काही बनत. जातीय-धामिर्क दंगे, नफेखोरी, लष्करी आक्रमण, अशा अनेक वाईट घटना समाजात घडत असतात. यात खोखाचा पुन: पुन्हा खून होताना दिसतो. नटांच्या शरीराचा वापर करून अवकाश व काळ यांची मंचावर सांगड घातली जाते.

थर्ड थिएटरचा प्रयोग करताना सरकार यांच्या मनात होतं, रंगमंचावर नटाचा नटाशी जसा संवाद होतो, तसाच नटाचा प्रेक्षकांशी, प्रेक्षकांचा नटांशी आणि प्रेक्षकांचा प्रेक्षकांशी अशा प्रकारेही संवाद व्हावा. नट व बघे असं नातं न राहता दोन माणसांमधील नातं त्यांच्यात तयार व्हावं. असं होण्यासाठी प्रेक्षकांच्या बसण्याची व्यवस्था ह्या विचाराला अनुकूल अशी केली जायची. प्रेक्षकांनी दुरून नाटक बघू नये तर नाटकाच्या अवकाशातून, त्याचा भाग होऊन ते अनुभवावं, हा हेतू असायचा. सरकार यांनी थर्ड थिएटरला, रंगमंचाचं लोकशाहीकरण, म्हटलं आहे.

अशा वेगळ्या प्रकारचं नाटक सादर करण्यासाठी नटांचं शिबीर घेऊन त्यांची तयारी करून घेणं आवश्यक होतं. कमानी रंगमंचावरून आलेल्या एका नटाने हा बदल किती आव्हानात्मक होता याबाबत म्हटलं आहे, 'थेट प्रेक्षकांच्या जवळ, त्यांच्यासमोर, त्यांच्या नजरेत नजर घालून बघायचं म्हणजे सत्त्वपरीक्षाच. कमानी रंगमंचावर मंच व प्रेक्षागृह यात अंतर असल्याने नटाला जी सुरक्षितता असते तीच आता नाही. जवळचा प्रेक्षक काय आणि कसा प्रतिसाद देईल, यावर अवलंबून राहावं लागणार. एका तिऱ्हाईत प्रेक्षकाशी बोलणं त्रासदायकच तरी ते आवश्यक होतं.'

नटांना अशा अनुभवाकरिता तयार करण्यासाठी, तसंच शरीराचा वापर करण्यातला संकोच घालवण्याकरिता सरकार यांनी शिबीरं घेतली. स्त्री व पुरुष कलाकार यांच्यात एकमेकांबद्दल विश्वास प्रस्थापित करणं हा या शिबीरांमधील सर्वात महत्त्वाचा एक्झरसाईज असायचा. शिबिरांनी काही आश्चर्याचे धक्केही दिले. कमानी रंगमंचावर जे नट कधीच चांगली कामगिरी करू शकले नव्हते, ते या ठिकाणी शारीर अभिनय करणारे नट म्हणून बहरास आले. त्यांनी आपली सृजनशीलतेची व कल्पनाशक्तीची चमक दाखवली. उलट काही नटांना मात्र कमानी रंगमंच ते थर्ड थिएटर हा प्रवास मानवला नाही, समूहाचा भाग होऊन काम करणं जमलं नाही.

थर्ड थिएटरची रुजवात करताना सरकार नाटककार म्हणून संहिता विकसित करण्याच्या दुसऱ्या पद्धतीकडे वळत होते. ती होती, शिबिरातील प्रक्रियेतून संहिता विकसित करत नेणे. नटांना अनेकदा ठराविक संवाद दिलेले नसत. प्रसंग-घटना देऊन ते त्यांना इम्प्रोव्हाइज करत न्यावे लागत. या रंगमंचावर असं कौशल्य त्यांच्याकडे असणं आवश्यक होतं. 'मिच्छिल'ची पूर्वतयारी म्हणून, नटांना वेगवेगळ्या प्रकारचे जुलूस बनवा, त्यातील क्रिया, प्रतिक्रिया, संवाद यांच्यात सुधारणा करत न्या, असं सांगितलं होतं. आणखी एक एक्झरसाईज होता, अखंड बोलत राहणे आणि बोलताना त्यात सुधारणा करत राहणे.

वयाची ८० वर्षं उलटून गेल्यावर, मागे वळून बघताना सरकारना त्यांची अवकाशाबद्दलची फिलॉसॉफी तितकीच महत्त्वाची वाटत होती. नट आणि प्रेक्षक समान आहेत. त्यांच्यात दुरावा नाही, त्यांच्यात थेट संवाद होत आहे, त्यामुळे ते बंधनांपासून मुक्त होत आहेत, हे त्यांनी साध्य केले. ते म्हणतात, 'शेवटी आम्ही जेव्हा पैशासाठी झोळी फिरवायचो, तेव्हा पैसे देण्याची सक्ती प्रेक्षकांवर नसायची. जर त्यांनी दिले तरी ते बक्षिस नसायचे किंवा ती किंमतही नसायची. तो एक सहभाग असायचा. जे बघायला मिळालं ते त्यांना आवडलं व अशा प्रकारचं थिएटर पुढेही सुरू राहावं, अशी त्यांची मनिषा त्या देण्यातून ते जाहीर करायचे. दोन माणसांमधील ते भावनिक संबंध होते.'

-उदय कुलकर्णी

http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/8492794.cms

बुधवार, १ जून, २०११

कविता-कट्टयावर

 माझे दोन लाडके कवी एकत्र, कविता-कट्टयावर!

मस्तक ठेउन
गेलीस जेव्हा
अगतिक माझ्या पायावरती

या पायांना
अदम्य इच्छा
ओठ व्हायची झाली होती...

--कुसुमाग्रज

माथा टेक के
जैसे गई तुम
मजबूर मेरे
दो पैरों पर...

इन पैरों को
शिद्दत से
दो होंठ होने की,
ख्वाहिश हुई थी!!

--गुलज़ार