मंगळवार, १८ ऑक्टोबर, २०११

मराठी रंगभूमीच्या तीस रात्री

"मराठी रंगभूमीच्या तीस रात्री" या लवकरच प्रकाशित होणा-या पुस्तकातील प्रत्येक रात्रीचा काही अंश सध्या क्रमाने Facebook.com च्या खालील पानावर प्रसिद्ध होत आहेत. लेखकाच्या अनुमतीने, तो इथेही क्रमश: प्रकाशित करत आहोत.
 
 

ओळख:

आधुनिक मराठी रंगभूमीला साधारणपणे गेल्या दीडशे-पावणेदोनशे वर्षांचा अत्यंत समृद्ध असा इतिहास आहे. या कालखंडात महाराष्ट्रातील -आणि भारतातील - सामाजिक राजकीय वास्तवात जेवढे मूलभूत बदल झाले तेवढे त्याआधीच्या काही हजार वर्षांत झाले नव्हते. मराठी रंगभूमी या बदलांची साक्षी होती आणि आपल्या परीने त्यांचे अर्थ लावत- कधी जाणीवपूर्वक तर कधी अजाणता- तिने काही सक्रीय भूमिकाही निभावली. 'मराठी रंगभूमीच्या तीस रात्री' हा अशा रंगभूमीचा विलक्षण इतिहास तर आहेच, पण त्याहीपुढे जाऊन, एका प्रकारे तो या कालखंडातील सामाजिक वास्तवाचाच मांडलेला एक लेखाजोगा आहे.

या ग्रंथात एक प्रयत्न जाणीवपूर्वक करण्यात आला आहे. या ग्रंथातील मांडणी, एका विदुषकाने एका नाटककाराला सांगितलेल्या तीस कथा अशा स्वरूपात मुद्दाम करण्यात आली आहे. या मांडणीत इतिहास अभ्यासाच्या शिस्तीबाबत कोणतीही तडजोड केलेली नसली, अशा स्वरूपामुळे हा ग्रंथ, या विषयाचा काही खास अभ्यास नसणार्‍या सामान्य वाचकासही एखाद्या कादंबरीप्रमाणे 'सहज' गुंतवून ठेवेल. या ग्रंथाच्या आशयाइतकीच त्याची शैलीही वैशिष्ट्यपूर्ण आहे.

लेखकाविषयी -
नाटककार आणि कादंबरीकार म्हणून मकरंद साठे यांनी साहित्यविश्वात स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले आहे. नाट्य-लेखनासोबतच नेपथ्यरचना, नाट्यदिग्दर्शन अशा नाट्यक्षेत्राशी जोडलेल्या गोष्टींमध्येही त्यांनी यश मिळवले आहे. 'चारशे कोटी विसरभोळे', 'रोमन साम्राज्याची पडझड', 'सापत्नेकराचे मूल', 'ऐसपैस सोईने बैस', 'ठोंब्या', 'सूर्य पाहिलेला माणूस', 'www.गोळायुग.com', 'चौक' या नाटकांबरोबरच, 'घर' आणि 'वाढदिवस' या दोन एकांकिकांचे लेखन त्यांनी केले आहे. त्यांपैकी सॉक्रेटिसच्या जीवनावरील 'सूर्य पाहिलेला माणूस', माणसाच्या जीवनावरचे भाष्य असलेले 'चौक' ही त्यांची गाजलेली नाटके. 'अच्युत आठवले आणि आठवण' ही त्यांची पहिली प्रकाशित कादंबरी. त्यानंतर 'ऑपरेशन यमू' ही कादंबरी प्रकाशित झाली. या दोन्ही कादंबर्‍या वेगळ्या वाटा निर्माण करणार्‍या ठरल्या.

दोन वर्षांपूर्वी बंगळुरूच्या 'इंडिया फौंडेशन फॉर द आर्टस' या फौंडेशनतर्फे मिळालेल्या अभ्यासवृत्तीचा भाग म्हणून 'मराठी रंगभूमीच्या तीस रात्री' हा मराठी रंगभूमीचा त्रिखंडात्मक राजकीय सामाजिक इतिहास त्यांनी नुकताच लिहून पूर्ण केला आहे व पॉप्युलरतर्फे तो लवकरच प्रकाशित होत आहे.

 माणसाचे जगणे, त्यातील व्यथांचे सूक्ष्म रेखाटन करणारे सुप्रसिद्ध चित्रकार सुधीर पटवर्धन यांच्या तीस चित्रांचा समावेश या ग्रंथात करण्यात आला आहे. प्रत्येक रात्रीच्या गोष्टीशी सुसंगत एक चित्र स्वत: मकरंद साठे यांनीच निवडले आहे. त्यामुळे एकूणच कलाप्रेमी रसिकांसाठी 'मराठी रंगभूमीच्या तीस रात्री' एक मेजवानी ठरणार आहे. 

 १७५० पृष्ठे असलेल्या या ग्रंथातील तीस रात्रींचे एकूण तीन भाग केले आहेत. पहिल्या भागात पंधरा रात्री आहेत.

1 टिप्पणी:

  1. Makarand Sathe and CalAA go back a long way - actually till the inception of CalAA. CalAA's first archival project in 2002: Soorya Pahilela Manoos, featuring Shreeram Lagoo (directed by Atul Pethe) was written by Makarand. Later Makarand and Atul made a documentary on Vijay Tendulkar which was produced by CalAA.

    उत्तर द्याहटवा