गुरुवार, १७ नोव्हेंबर, २०११

'मराठी रंगभूमीच्या तीस रात्री' : रात्र ८

 
लेखक : मकरंद साठे
प्रकाशक : पॉप्युलर

१. प्रायोगिकतेची सुरुवात : राम गणेश गडकरी -
सं. प्रेमसंन्यास, सं. एकच प्याला, सं. मूकनायक ३१७
२. दिवाकर - कारकून, मग तो दिवा कोणता? ३४६
... ३. १९३० पर्यंतचे नाटक व स्त्रिया - आणि स्त्रीपार्टी नट ३५१


मी लेखकाला म्हटलं, तर आज तुमचे बाप असं ज्यांना काही जण म्हणतात, आणि तुम्ही ज्यांना मेलोड्रॅमॅटिक म्हणून बाद करता त्या गडकर्‍यांपासून सुरुवात करू.

हा जो अभिजनवर्गाचा स्वरूपशोधाचा प्रवास चालू होता त्याचे त्या काळात तीन टप्पे दिसतात. त्यांच्यामुळे अर्थातच तीन प्रमुख प्रवाह तयार झाले. पहिले दोन म्हणजे, देवल आणि खाडिलकर. तिसरा टप्पा होता गडकर्‍यांचा.

इथेही शेक्सपीयरशी नातं आहेच. पाश्चात्त्य आधुनिकतेशी भिडणं आहे, सामाजिक राजकीय जाणही आहे. परंतु तरीही हा प्रवाह संपूर्णपणे वेगळा आहे.

त्याचं एक कारण म्हणजे जरी ही नाटकं सुद्धा विधवाविवाह, दारूचे दुष्परिणाम अशा सामाजिक प्रश्नांवर असली तरी त्या प्रश्नांच्या तात्कालिक कारणमीमांसेशी वा तात्कालिक विशिष्ट स्वरूपानंच मर्यादित अशी नव्हती. किंबहुना या नाटकांत सामाजिकता तशी बेताबेताचीच, चवीपुरती होती!

गडकर्‍यांबाबत महत्त्वाची होती ती त्यांची जीवनदृष्टी, विचारव्यूह. तिचा आवाकाच मोठा होता. आणि तो तसा असला की आडवळणानं का होईना पण सामाजिकदृष्ट्या काहीतरी महत्त्वाचं असं हाती लागतंच.

आधी त्यांच्या दुर्गणांची, अनेक लोकांनी परत परत केलेली यादी बघून टाकू. ती यादी साधारणपणे अशी : कृत्रिम, अस्वाभाविक, अतर्क्य घटनांनी भरलेलं कथासूत्र, अतिरेकी कल्पना चमत्कृती, विरोधाभास, कोटीबाजपणाची हौस, प्रचंड अलंकारिक भाषाशैली, कृत्रिम, पान दोन पानांची भावुकतेनं ओथंबलेली स्वगतं, एकंदरीनं सर्वच गोष्टींचा अतिरेक. एका प्रकारे पाश्चात्त्य वास्तववादी नाट्यशैलीला पूर्णपणे अमान्य असणार्‍या अशा अनेक गोष्टी. आणि हे सर्व खरंच आहे.

पण गडकर्‍यांचं महत्त्व त्या पलीकडे उरतं. याचं एक कारण म्हणजे आपण मघाशी म्हटल्याप्रमाणे त्यांची व्यापक जीवनदृष्टी. आणि दुसरं म्हणजे आपला विषय. आपल्याला शैलीशी एका विशिष्ट प्रकारेच देणंघेणं आहे. त्याचं निव्वळ सौंदर्यवादी विवेचन आपल्या विषयात बसत नाही. त्यामुळेही गडकरी आपल्यासाठी महत्त्वाचे होतात.

गडकर्‍यांचा जन्म... नाही, सांगलीचा नाही - गुजराथमधल्या एका छोट्या गावातला. उणंपुरं ३४ वर्षांचं आयुष्य त्यांना लाभलं. गरिबीमुळे त्यांना मॅट्रिकला शिक्षण थांबवावं लागलं. गडकरी दुपारच्या वेळी किर्लोस्कर कंपनीत लहान मुलांच्या तालमी घेत, आणि रात्री नाट्यगृहाचे डोअरकीपर म्हणून काम करत. हे सांगण्याचा हेतू म्हणजे ते खाडिलकरांसारखे उच्चविद्याविभूषित चतुरस्र पत्रकार वगैरे नव्हते हे ध्यानात ठेवणं महत्त्वाचं आहे. त्यांच्या भोवती तसं वातावरणही नव्हतं. या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर त्यांचा - world view - जीवनदृष्टी स्तिमित करणारी आहे.

***

गडकर्‍यांवर अनेक समकालीन लेखकांप्रमाणे शेक्सपीयरचा मोठाच प्रभाव होता हे सर्वश्रुत आहे. पण त्यांनी इब्सेनही वाचला होता. त्यांना शिक्षण अर्धवट सोडावं लागलं असलं तरी त्यांचं वाचन चौफेर होतं. आणि चिंतनही. त्यांची सनातनी बाजूला झुकणारी वृत्तीही जाणवते. ‘पुण्यप्रभावा’मध्ये तर ते पूर्णपणेच सनातनी विचारांकडे झुकतात.’ पण या सनातनीपणात-आधी म्हटल्याप्रमाणे -वेगळ्या जीवनदृष्टीची भर आहे. तो उथळ नाही. त्यामागे एक संवेदनक्षम मन आहे. ते फक्त रूढिकल्पनांत अडकलेले नाही. ते त्यामागील तत्त्वविचार व विरोधी तत्त्वांतील संघर्ष जाणून घेऊन सामाजिक अंतःप्रवाहांकडे बघणारे आहे. हे जास्त जाणवतं ते ‘एकच प्याला’ या नाटकात. या नाटकात दारूच्या अतिरेकाचे दुष्परिणाम तर आहेतच पण काही लोक नंतर म्हणू लागले त्याप्रमाणे ‘पातिव्रत्याच्या अतिरेकाचे’ दुष्परिणामही आहेत! आणि ते त्यांच्या शैलीतील आधी मांडलेल्या अतिरेक, अतिरंजितता, अतिअलंकारिकता, अशा सर्व दोषांसहितच आहेत. या नाटकाच्या या घटकांविषयी भरपूर लिहिलं बोललं गेलं आहे, आणि मुख्य म्हणजे त्याचा आपल्या विषयाशी तसा संबंध नाही.
तसंच दुसर्‍या बाजूला, गाडगीळ आपल्या लेखात म्हणतात त्याप्रमाणे अनेक दोष लक्षात घेऊनही ती मराठीतील सर्वोत्तम ट्रॅजिडी असं म्हणावं लागतं. त्यांच्याच शब्दात सांगायचं झालं तर, ‘हे नाटक असल्यामुळे शोकात्म अनुभवाची तीव्रता आणि भीषणता व्यक्त करण्याचे सामर्थ्य त्यात विशेष प्रमाणात आहे. मराठी भाषेतील उत्कृष्ट शोकात्मक नाटक कुठले असे विचारले तर एकदम नव्हे, पण विचारांती ‘एकच प्याला’ हे उत्तर द्यावे लागेल.'

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा