गुरुवार, २८ एप्रिल, २०११

... तव आंतर अग्नी क्षणभर तरि फुलवावा!

हे कुसुमाग्रज जन्मशताब्दी वर्ष.

कुसुमाग्रजांचा प्रवेश माझ्या मर्यादित काव्य विश्वात कधी बरं झाला? शाळेच्या मराठी पाठ्यपुस्तकातून "नको ग नको ग आक्रंदे जमीन ..." च्या नादानं किंवा "वेडात मराठे वीर दौडले सात ..." च्या जोशानं वेडावून जाण्याच्या खूप आधी...  "उठा उठा चिऊताई" च्या हळवेपणानं माझ्या भावविश्वाला नादावून टाकलं होतं; "कुसुमाग्रज" हे नाव माहीत होण्याच्या खूप आधी!  मग हळू हळू "हजार जिव्हा...", "युगामागुनी युगे चालली ही...", "नवलाख तळपती दीप...", "प्रेम कुणावर करावं...", "चार होत्या पक्षिणी त्या..." अशा कितीतरी कवितांमधून कळत्या नकळत्या वयात कुसुमाग्रज आवडत गेले, रुतत गेले. इतके, की शाळेतल्या मराठीच्या पेपरमधे निबंधात कसंही करून त्यांच्या कवितेच्या ओळी वापरल्या की छान मार्क पडतात अशी माझी नितांत श्रद्धा होती!

कुसुमाग्रजांच्या जन्मशताब्दीनिमित्त, ’कला’कार सुरु करत आहेत "कविता कट्टा". येत्या ’समीप रंगमंच’ च्या प्रयोगाच्या मध्यंतरात आपण सगळे - ’कला’कार, ’कला’प्रेमी, ’कला’प्रेक्षक - छोटासा काव्यवाचनाचा कार्यक्रम करुया. तुम्हाला आवडतील अशा कविता घेउन या. कवी, विषय, छंद ... कशाचं बंधन नाही. तुम्हाला ज्या आवडतात - तुम्ही रचलेल्या कविता सुद्धा - ज्या सगळ्यांना ऐकायला आवडतील अशा कविता. वाचुया, ऐकुया!

तुम्हाला भाग घ्यायचा असेल, तर या post वर ’प्रतिक्रिया’तून तुमचा email पत्ता कळवा. तुमची माहिती इथे प्रसिद्ध केली जाणार नाही.

भेटूया लवकरच!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा