रविवार, ७ ऑगस्ट, २०११

बृहन् महाराष्ट्र मंडळ अधिवेशन, शिकागो

अमेरिकेतही मराठी नाटकांना मोठा प्रेक्षक वर्ग असल्याने अनेक कला मंडळे दर्जेदार मराठी नाटकांची निर्मिती करतात आणि प्रेक्षकांना उत्तम नाट्यकृती बघण्याची संधी उपलब्ध करून देतात. अशाप्रकारे नाट्यनिर्मिती करणा-या संस्थांपैकीच एक मोठी संस्था म्हणजे ‘कॅलिफोर्निया आर्ट असोसिएशन’. या संस्थेची दहा वर्षांपूर्वी स्थापना झाली आणि तेव्हापासून अनेक दर्जेदार नाटकांची संस्थेने निर्मिती केली. शिकागो येथे होणा-या अधिवेशनात या संस्थेतर्फ़ेही काही एकांकिका सादर केल्या जाणार आहेत. त्याबाबत माहिती घेण्यासाठी ‘कॅलिफोर्निया आर्ट असोसिएशन’चे अध्यक्ष मुकूंद मराठे यांच्याशी केलेली बातचीत....
   अमेरिकेतून सादर होणा-या कार्यक्रमांबद्द्ल त्यांना विचारले असता ते म्हणाले की, "अमेरिकेतील खूप वेगवेगळ्या शहरातून अनेक कार्यक्रम तिथे सादर होणार आहेत. त्यात कॅलिफोर्निया आर्ट असोसिएशनला सुद्धा कार्यक्रम सादर करण्याची संधी मिळाली आहे. याआधीच्या सुद्धा अधिवेशनात आम्हाला एकांकिका आणि नाटक सादर करण्याची संधी मिळाली आहे. यात आम्ही आमच्या समीप रंगमंच व्दारे कार्यक्रम सादर करणार आहोत. आमच्या या वेगळ्या उपक्रमात ऑडिटोरिअम न घेता लोकांच्यामध्ये जाऊन आम्ही नाटक सादर करतो. जेणेकरून प्रेक्षकांच्या अधिक जवळ ती कलाकृती सादर व्हावी. जनरली प्रेक्षकांना इतक्या जवळून नाटकाचा अनुभव घेता येत नाही. यातून ते होतं आणि आणखी जास्त चांगला संवाद साधला जातो. भारतात असे प्रयोग अमोल पालेकर यांनीही केले आहेत. इथेही आम्ही तसाच प्रयोग करणार आहोत. म्हणजे लोकांना त्याचा चांगला अनुभव घेता येईल. या संकल्पनेबद्द्ल ज्यावेळी कार्यक्रम कमिटीला मी सांगितली तेव्हा त्यांना ती खूप आवडली आणि त्यांनी या कार्यक्रमांना होकार दिला".
   अधिवेशनात सादर केल्या जाणा-या कार्यक्रमांबद्दल सांगतांना ते म्हणाले की, "यावेळेला अधिवेशनात आम्ही कला तर्फ़े चार एकांकिका सादर करणार आहोत. ह्या सादर होणा-या कलाकृती फक्त कला संस्थेंपर्यंतच मर्यादीत राहू नये, यासाठी अमेरिकेतील सुभंग ओक हे ‘गप्पा’ ही एक एकांकिका सादर करणार आहेत. त्याशिवाय आम्ही दोन एकांकिका करणार आहोत. त्यातील एक म्हणजे जी.ए.कुलकर्णी यांची ‘स्वामी’ ही प्रसिद्ध कलाकृतीचं नाट्य रूपांतर करून ते सादर करणार आहोत. आणि दुसरी एकांकिका आहे ती पुण्याच्या धर्मकिर्ती सुमन यांनी लिहीलेली ‘पाणी’ ही एकांकिका. आणि सुहास तांबे लिखित ‘सॅट जोशी’ ही सुद्धा एकांकिका सादर होणार आहे".
   या सर्व कार्यक्रमांचे वैशिष्ट्य काय असणार याबद्द्ल विचारता त्यांनी सांगितलं की, "वैशिष्ट्य असं की ह्या सगळ्या एकांकिका वेगवेगळ्या विषयांच्या आहेत. सादरीकरणाच्या दृष्टीने नावीन्यपूर्ण असलेल्या आहेत. जरी आम्हाला समीप रंगमंच सारखी व्यवस्था मिळणार नसली तरीही जास्तीत जास्त लोकांना ती जवळून कशी बघता येईल याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. जरी तिथे जास्त फॅसिलिटीज नसल्या, लाईट्स नसले तरीही जर चांगले कलाकार असले, चांगली कलाकृती असेल तर त्याला नक्कीच प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळतो. यात महत्वाचं म्हणजे जास्त मेकअप आणि टेक्निकल गोष्टी नसतानाही फक्त चांगल्या अभिनयाच्या जोरावर ती कलाकृती सादर केली जाणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांना ती आवडेल अशी आशाही त्यांनी यावेळी व्यक्त केली".
   श्री. मराठे हे कॅलिफोर्निया आर्ट असोसिएशनचे अध्यक्ष आहेत त्यामुळे या संस्थेबाबत त्यांना विचारले असता ते म्हणाले, की, "या असोसिएशनची स्थापना गेल्या १० वर्षांपूर्वी झाली. अनेक अधिवेशनामध्ये अनेक शहरात आम्ही आत्तापर्यंत कार्यक्रम केलेत. सॅनफ्रॅन्सिसको बे एरियातील आम्ही काही नाट्यवेड्या मंडळीनी एकत्र येऊन या कला संस्थेची स्थापना केली. आणि अनेक उत्तम कलाकृतींची निर्मिती केली. त्या माध्यमातून अनेक जुन्या नाटकांचे प्रयोग केलेत आणि अजूनही करत आहेत. आमचा आणखी एक उद्देश हा आहे की, जास्तीत जास्त जुन्या नाटकांचं जतन केलं जावं. त्यासाठी काही दर्जेदार नाटकांचे चित्रीकरण करून त्यांचं जतन करण्याचा प्रयत्न केला आहे. काय होतं की, अनेक जुन्या कलाकृती ह्या पुन्हा पुन्हा होत नाहीत म्हणून हे जतन करण्याचा आमचा प्रयत्न आहे. अनेक अद्वितीय अशा कलाकृती बघीतल्या गेल्या पाहिजे असं आम्हाला वाटतं".
   एवढ्या मोठ्या प्रमाणात नाटकांची निर्मिती केल्यावर त्याला प्रेक्षकांचा प्रतिसाद कसा मिळतो, याबद्द्ल सांगतांना ते म्हणाले की, खूप चांगला प्रतिसाद मिळतो. जर त्या कलाकृती उत्तम आणि दर्जेदार असतील तर नक्कीच त्याला प्रेक्षक चांगला प्रतिसाद देतात".
   तिकडे मराठी नाटकांची निर्मिती करतांना कलाकारांच्या अडचणी येत असतील असं विचारता ते म्हणाले की, "नाही..फार अडचण जात नाही कारण इकडे खूप चांगलं टॅलेंट आढळून येतं. अनेक चांगले कलाकार इकडे मिळतात. एवढंच काय तर त्यांच्या अभिनयाची क्षमताही प्रोफेशनल कलाकारांच्या बरोबरीचीच असल्याचं त्यांनी सांगितलं.
   या संस्थेव्दारे भारतात कधी प्रयोग केलेत का असं विचारता ते म्हणाले की, अजून तरी नाही. पण संधी मिळाल्यास आम्ही नक्की भारतात नाटकांचे प्रयोग करू", असं ते म्हणाले.
   अधिवेशनात येणा-या प्रेक्षकांना संदेश देतांना ते म्हणाले की, बीएमएम तर्फ़े घेतल्या जाणा-या अधिवेशनाकडे प्रेक्षकांनी फक्त मनोरंजन म्हणून बघू नये. कारण बीएमएमची स्थापन होण्याचा आणि त्याद्वारा ही अधिवेशने भरविण्याच्या एक मोठा आणि महत्वाचा उद्देश आहे. तो फक्त एक मेळावा राहू नये. त्याचे अनेक उद्देशही त्यातून साध्य व्हायला हवेत. त्यादृष्टीनेही मराठी लोकांनी जागृत राहायला पाहिजे", असा संदेश त्यांनी दिला.
   शेवटी या अधिवेशनाबद्दल बोलतांना ते म्हणाले की, यावेळी आयोजकांनी खरंच खूप वेगळे आणि दर्जेदार कार्यक्रम आयोजित केले आहे. त्यात गिरीश जोशींसारख्या प्रतिभावंत लेखक-दिग्दर्शकांचे वेगळ्या विषयावरचे ‘लव्ह बर्डस’ हे नाटक ठेवलं आहे. तसेच गिरीश कर्नाड यांचं ‘तूला मी मला मी’ हे सुद्धा नाटक ठेवलं आहे. ही प्रेक्षकांसाठी खरंच खूप चांगली संधी असेल चांगल्या कलाकृती बघण्याची. त्याशिवाय आपल्या सर्वांसाठी अभिमानास्पद असलेला आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीचं दर्शन करून देणारा ‘मराठी बाणा’ हा अशोक हांडे यांचा कार्यक्रमही ठेवण्यात आला आहे. हे खरंच खूप चांगलं आहे", असं त्यांनी शेवटी व्यक्त केलं.
   महाराष्ट्रात मराठी रंगभूमीला चांगले दिवस आल्याची चर्चा होत असतांना सातासमुद्रापार असलेल्या देशांमध्ये सुद्धा मराठी नाटकांची एवढ्या मोठ्या प्रमाणात निर्मिती केली जाते. तेही नवनवीन प्रयोग करून खरंच हे खूप कौतुक करण्यासारखं आहे. तसंच प्रेक्षकांचाही चांगल्या कलाकृतींना प्रतिसाद मिळतो. अशाप्रकारे जर तिकडे नाट्यनिर्मिती होत राहीली तर नक्कीच तिकडच्या मराठी बांधवांना आपली मराठी नाटकांची भूक सहज भागवता येईल. त्यासाठी कॅलिफोर्निया आर्ट असोसिएशन आणि त्यासंबंधीत कलावंतांना या अधिवेशनात सादर होणा-या आणि पुढील प्रयोगांसाठी झगमग टीमतर्फ़े हार्दीक शुभेच्छा...!

- अमित इंगोले

सोमवार, ६ जून, २०११

समीप रंगमंच : Intimate Theater

कलानं ’समीप रंगमंच’चा तिसरा प्रयोग १५ मे ला सादर झाला. ’समीप रंगमंच’चे प्रयोग तुम्ही बघितले असतील, तर "पारंपारिक" नाटकापेक्षा त्यात असलेला वेगळेपणा तुम्ही अनुभवला असेल. समीप रंगमंच - किंवा Intimate Theater किंवा Theater In a Room - हा नाट्याविष्कार प्रेक्षक आणि कलाकार यांमधली अदृष्य भिंत दूर करतो, या दोघांमधलं अंतर कमी करतो. नाट्य प्रेक्षकांच्या समीप, प्रेक्षकांमधेच घडतं. समीप रंगमंचचा प्रयोग प्रेक्षकांना नाट्य जवळून अनुभवायची संधी देतो.

नाटकाच्या या जातकुळीबद्दल वाचा उदय कुलकर्णी यांनी लिहिलेल्या महाराष्ट्र टाइम्स मधे प्रकाशित झालेल्या या लेखात:

--
शोध नट-प्रेक्षकातील नात्याचा!

प्रचलित कमानी रंगमंचाच्या पलीकडे जाणाऱ्या प्रयोगशील नाटकांचा शोध घेणारं 'बियाँड प्रोसेनिअम - रिइमॅजिनिंग स्पेस फॉर परफॉर्मन्स' हे अनमोल वेलानी यांनी संपादित केलेलं पुस्तक इंडिया फाऊं डेशन फॉर द आर्टस् या संस्थेने प्रकाशित केलं आहे. त्यातील बादल सरकार यांच्या थर्ड थिएटरवर नेमका प्रकाश टाकणा-या अंजुम कट्याल यांच्या लेखाचा हा संक्षेप...
...........

शहरी रंगभूमीवर नाटकं सादर केली जातात, तेव्हा त्यात नटमंडळी आणि प्रेक्षक हे सरळ सरळ दोन वेगळे घटक असतात. ह्या दोन्ही घटकांचे अवकाश पूर्णपणे वेगळे असतात. नट ज्या भागात असतात, त्याला रंगमंच म्हटलं जातं, तो एका बाजूला असतो. ज्या खोल्यांतून वेशभूषेसह नट रंगमंचावर येतात, त्या खोल्या प्रेक्षकांना दिसणार नाहीत याची काळजी घेतलेली असते. रंगमंचाच्या समोर जो दुसरा भाग असतो, त्या जागेत प्रेक्षक बसतात, त्याला प्रेक्षागृह म्हटलं जातं. यात आसनांच्या रांगा असतात व त्या सर्व रंगमंचाच्या दिशेने तांेड करून असतात. यामुळे शेवटची रांग रंगमंचापासून बरीच दूर असते. नटमंडळी आणि प्रेक्षक ह्या दोन घटकांदरम्यान असणारा पहिला अडथळा म्हणजे त्यांचं परस्परांपासून लांब अंतरावर असणं. रंगमंच व प्रेक्षागृह वेगवेगळ्या उंचीवर असतात, ते समपातळीवर नसतात, हा दुसरा अडथळा. आणि तिसरा अडथळा असतो अंधाराचा. रंगमंचावर प्रकाश असतो तर प्रेक्षागृहात अंधार असतो. ह्या उजेड-अंधार फरकामुळे नटमंडळी व प्रेक्षक ह्या दोन घटकांमध्ये सर्वात जास्त दुरावा निर्माण होतो. नट असं भासवतात की, समोर कोणी बसलेलंच नाही. प्रेक्षक अंधाराच्या साहाय्याने लपून बसतात व तेही भासवतात की, ते तिथे उपस्थित नाहीत, रंगमंचावर जे सुरू आहे ते प्रत्यक्ष आयुष्यात घडतं आहे.

- बादल सरकार

बादलदांच्या या विचारातूनच दिसेल की, नट आणि प्रेक्षक यांच्यातील दुरावा त्यांना नको होता. त्यांना नट व प्रेक्षक यांच्यात थेट संवाद साधायचा होता. जगात प्रगत रंगभूमीवर काय घडतं आहे याचा त्यांनी अभ्यास केला आणि थर्ड थिएटरसाठी स्वत:ची तत्त्वं बनवली. अवकाश हा त्या विचारांमध्ये कळीचा मुद्दा होता. त्यांच्या कल्पनेत थर्ड थिएटरचे दोन प्रकार होते. एक 'आंगनमंच'. हे इंटिमेट थिएटरसारखं असेल. मोजक्या प्रेक्षकांच्या अगदी सान्निध्यात प्रयोग होईल. नट व प्रेक्षक समपातळीवर आणि सारख्याच उजेडात असतील. नटांना प्रेक्षकांच्या मागे, बाजूला जाता येईल, त्यांना स्पर्श करता येईल, त्यांच्याशी व्यक्तिगत संभाषण करता येईल. यात प्रेक्षक चारही बाजूला, अगदी मध्यभागीही बसतात आणि त्यांच्यामध्ये मोकळ्या असलेल्या भागात नाटक घडतं.

थर्ड थिएटरचा दुसरा प्रकार 'मुक्तमंच' किंवा 'माथेर नाटक'. इथे प्रेक्षकांबरोबर सामीप्य असणं, हा हेतू नसतो. मैदानात किंवा गावातील बाजारात, शाळेच्या पटांगणात, झोपडपट्टी भागातील मोकळ्या जागेत असं कुठेही ते नेलं जाऊ शकतं. अशा ठिकाणी दोन हजार-पाच हजारांचा जमाव सहज जमलेला असतो. यात नट आणि प्रेक्षक यांच्यात जवळिक साधणं शक्य नाही व ते अपेक्षितही नाही. पण त्याऐवजी इतर फायदे मिळतात. आंगनमंच प्रकारात नाटक जिथे सादर होणार आहे, तिथे प्रेक्षकांना आमंत्रित करावं लागतं. उलट मुक्तमंच प्रकारात जिथे प्रेक्षक उपस्थित आहेत तिथे नाटक नेलं जातं. यामुळे खूप जास्त प्रेक्षकांपर्यंत नाटक आणि त्याचा संदेश जातो. 'मिच्छिल' (मराठीतील 'जुलूस') या नाटकात त्यांनी या आपल्या संकल्पना प्रत्यक्षात आणल्या.

आंगनमंच प्रकारात 'मिच्छिल' सादर करताना त्यांनी ज्या प्रकारे प्रेक्षकांच्या बसण्याची व्यवस्था केली होती, ती त्यांनी त्याआधी 'स्पार्टाकस'चा प्रयोग करतानाही वापरली होती. एका प्रेक्षकाच्या 'स्पार्टाकस'च्या आठवणी लख्ख आहेत. तो म्हणाला, 'बंडाळीचा बीमोड झाल्यानंतर नट अरूंद मागिर्केतून रांगत पुढे सरकत. त्यांची तांेडं आमच्या गुडघ्यांना जवळपास स्पर्श करत असत आणि ते आमच्याकडे बघत कुजबुजत, 'आम्ही परत येऊ'...त्यांचं हे सान्निध्य तुमच्या जाणीवांवर आघात करतं. नट जणू त्या संकल्पनेचे वाहक बनतात. याप्रकाराने आम्ही रंगमंचाच्या अवकाशात ओढले गेलो.'

' मिच्छिल'ची सुरुवात घंटा वाजवून होते. प्रेक्षक असल्याप्रमाणे कोरस प्रवेश करतो, अॅक्टींग एरीयातून चहुकडे विखुरतो आणि बसण्यासाठी जागा शोधत आहोत, असं दाखवतो. घंटा वाजणं बंद होतं. लगेच सगळे दिवे बंद होतात. अंधारात कोलाहल ऐकू येतो. ते ब्लॅकआउटची कारणं काय असतील याची चर्चा करत आहेत, एकमेकांना सावध राहण्याची सूचना करत आहेत. अचानक एक प्राणांतिक किंकाळी ऐकू येते. कोरस, खून झाला असेल किंवा अपघात किंवा कोणाला भोसकलं असेल, याचा अंदाज करायला लागता. टॉर्च, काडेपेटी, लायटर काहीही लावून प्रकाश करा म्हणतो. कोरस गांेधळलेला आहे. अचानक एका पोलीस अधिकाऱ्याचा जरब बसवणारा आवाज ऐकू येतो, 'काय गांेधळ सुरू आहे?' अनेकजण उत्तरं देतात. कोणी सांगतं, किंकाळी ऐकू आली, कोणी सांगतं, कोणाचा तरी खून झाला, कोणी सांगतं, कोणाला तरी भोसकलं गेलं. अधिकारी हुकूम सोडतो, गप्प बसा. लगेच प्रकाश पडतो. लष्करी इतमामात उभा असलेला अधिकारी विचारतो, 'कोणाचा खून झाला?' कोरस शोध घेतं, पण प्रेत मिळत नाही. अधिकारी त्यांना, खोट्या अफवा पसरवू नका, असं दरडावत घरी जायला सांगतो. त्याच क्षणाला 'खोखा', एक तरूण नट - जो गुपचूप प्रेक्षकांमध्ये बसून आहे, लोळागोळा होऊन जमिनीवर पडतो.

यावरून दिसून येईल की नाटकाच्या सुरुवातीपासूनच नाटक सादर करण्याची जागा व प्रेक्षकांची जागा यात भेद केलेला नाही. प्रेक्षकांमध्येच राहून नट नाटक सादर करतात. प्रकाश व अंधार दोन्हीना, दोघांनाही सामोरं जावं लागतं आणि नट कोण आहेत व प्रेक्षक कोण, हे ओळखताही येत नाही.

या नाटकात कमीतकमी नेपथ्याचा वापर असल्याने अनेक नट मिळून शरीराचा वापर करून झाड, जंगल, रेल्वेचा डबा, बस असं सगळं काही बनत. जातीय-धामिर्क दंगे, नफेखोरी, लष्करी आक्रमण, अशा अनेक वाईट घटना समाजात घडत असतात. यात खोखाचा पुन: पुन्हा खून होताना दिसतो. नटांच्या शरीराचा वापर करून अवकाश व काळ यांची मंचावर सांगड घातली जाते.

थर्ड थिएटरचा प्रयोग करताना सरकार यांच्या मनात होतं, रंगमंचावर नटाचा नटाशी जसा संवाद होतो, तसाच नटाचा प्रेक्षकांशी, प्रेक्षकांचा नटांशी आणि प्रेक्षकांचा प्रेक्षकांशी अशा प्रकारेही संवाद व्हावा. नट व बघे असं नातं न राहता दोन माणसांमधील नातं त्यांच्यात तयार व्हावं. असं होण्यासाठी प्रेक्षकांच्या बसण्याची व्यवस्था ह्या विचाराला अनुकूल अशी केली जायची. प्रेक्षकांनी दुरून नाटक बघू नये तर नाटकाच्या अवकाशातून, त्याचा भाग होऊन ते अनुभवावं, हा हेतू असायचा. सरकार यांनी थर्ड थिएटरला, रंगमंचाचं लोकशाहीकरण, म्हटलं आहे.

अशा वेगळ्या प्रकारचं नाटक सादर करण्यासाठी नटांचं शिबीर घेऊन त्यांची तयारी करून घेणं आवश्यक होतं. कमानी रंगमंचावरून आलेल्या एका नटाने हा बदल किती आव्हानात्मक होता याबाबत म्हटलं आहे, 'थेट प्रेक्षकांच्या जवळ, त्यांच्यासमोर, त्यांच्या नजरेत नजर घालून बघायचं म्हणजे सत्त्वपरीक्षाच. कमानी रंगमंचावर मंच व प्रेक्षागृह यात अंतर असल्याने नटाला जी सुरक्षितता असते तीच आता नाही. जवळचा प्रेक्षक काय आणि कसा प्रतिसाद देईल, यावर अवलंबून राहावं लागणार. एका तिऱ्हाईत प्रेक्षकाशी बोलणं त्रासदायकच तरी ते आवश्यक होतं.'

नटांना अशा अनुभवाकरिता तयार करण्यासाठी, तसंच शरीराचा वापर करण्यातला संकोच घालवण्याकरिता सरकार यांनी शिबीरं घेतली. स्त्री व पुरुष कलाकार यांच्यात एकमेकांबद्दल विश्वास प्रस्थापित करणं हा या शिबीरांमधील सर्वात महत्त्वाचा एक्झरसाईज असायचा. शिबिरांनी काही आश्चर्याचे धक्केही दिले. कमानी रंगमंचावर जे नट कधीच चांगली कामगिरी करू शकले नव्हते, ते या ठिकाणी शारीर अभिनय करणारे नट म्हणून बहरास आले. त्यांनी आपली सृजनशीलतेची व कल्पनाशक्तीची चमक दाखवली. उलट काही नटांना मात्र कमानी रंगमंच ते थर्ड थिएटर हा प्रवास मानवला नाही, समूहाचा भाग होऊन काम करणं जमलं नाही.

थर्ड थिएटरची रुजवात करताना सरकार नाटककार म्हणून संहिता विकसित करण्याच्या दुसऱ्या पद्धतीकडे वळत होते. ती होती, शिबिरातील प्रक्रियेतून संहिता विकसित करत नेणे. नटांना अनेकदा ठराविक संवाद दिलेले नसत. प्रसंग-घटना देऊन ते त्यांना इम्प्रोव्हाइज करत न्यावे लागत. या रंगमंचावर असं कौशल्य त्यांच्याकडे असणं आवश्यक होतं. 'मिच्छिल'ची पूर्वतयारी म्हणून, नटांना वेगवेगळ्या प्रकारचे जुलूस बनवा, त्यातील क्रिया, प्रतिक्रिया, संवाद यांच्यात सुधारणा करत न्या, असं सांगितलं होतं. आणखी एक एक्झरसाईज होता, अखंड बोलत राहणे आणि बोलताना त्यात सुधारणा करत राहणे.

वयाची ८० वर्षं उलटून गेल्यावर, मागे वळून बघताना सरकारना त्यांची अवकाशाबद्दलची फिलॉसॉफी तितकीच महत्त्वाची वाटत होती. नट आणि प्रेक्षक समान आहेत. त्यांच्यात दुरावा नाही, त्यांच्यात थेट संवाद होत आहे, त्यामुळे ते बंधनांपासून मुक्त होत आहेत, हे त्यांनी साध्य केले. ते म्हणतात, 'शेवटी आम्ही जेव्हा पैशासाठी झोळी फिरवायचो, तेव्हा पैसे देण्याची सक्ती प्रेक्षकांवर नसायची. जर त्यांनी दिले तरी ते बक्षिस नसायचे किंवा ती किंमतही नसायची. तो एक सहभाग असायचा. जे बघायला मिळालं ते त्यांना आवडलं व अशा प्रकारचं थिएटर पुढेही सुरू राहावं, अशी त्यांची मनिषा त्या देण्यातून ते जाहीर करायचे. दोन माणसांमधील ते भावनिक संबंध होते.'

-उदय कुलकर्णी

http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/8492794.cms

बुधवार, १ जून, २०११

कविता-कट्टयावर

 माझे दोन लाडके कवी एकत्र, कविता-कट्टयावर!

मस्तक ठेउन
गेलीस जेव्हा
अगतिक माझ्या पायावरती

या पायांना
अदम्य इच्छा
ओठ व्हायची झाली होती...

--कुसुमाग्रज

माथा टेक के
जैसे गई तुम
मजबूर मेरे
दो पैरों पर...

इन पैरों को
शिद्दत से
दो होंठ होने की,
ख्वाहिश हुई थी!!

--गुलज़ार

गुरुवार, २८ एप्रिल, २०११

... तव आंतर अग्नी क्षणभर तरि फुलवावा!

हे कुसुमाग्रज जन्मशताब्दी वर्ष.

कुसुमाग्रजांचा प्रवेश माझ्या मर्यादित काव्य विश्वात कधी बरं झाला? शाळेच्या मराठी पाठ्यपुस्तकातून "नको ग नको ग आक्रंदे जमीन ..." च्या नादानं किंवा "वेडात मराठे वीर दौडले सात ..." च्या जोशानं वेडावून जाण्याच्या खूप आधी...  "उठा उठा चिऊताई" च्या हळवेपणानं माझ्या भावविश्वाला नादावून टाकलं होतं; "कुसुमाग्रज" हे नाव माहीत होण्याच्या खूप आधी!  मग हळू हळू "हजार जिव्हा...", "युगामागुनी युगे चालली ही...", "नवलाख तळपती दीप...", "प्रेम कुणावर करावं...", "चार होत्या पक्षिणी त्या..." अशा कितीतरी कवितांमधून कळत्या नकळत्या वयात कुसुमाग्रज आवडत गेले, रुतत गेले. इतके, की शाळेतल्या मराठीच्या पेपरमधे निबंधात कसंही करून त्यांच्या कवितेच्या ओळी वापरल्या की छान मार्क पडतात अशी माझी नितांत श्रद्धा होती!

कुसुमाग्रजांच्या जन्मशताब्दीनिमित्त, ’कला’कार सुरु करत आहेत "कविता कट्टा". येत्या ’समीप रंगमंच’ च्या प्रयोगाच्या मध्यंतरात आपण सगळे - ’कला’कार, ’कला’प्रेमी, ’कला’प्रेक्षक - छोटासा काव्यवाचनाचा कार्यक्रम करुया. तुम्हाला आवडतील अशा कविता घेउन या. कवी, विषय, छंद ... कशाचं बंधन नाही. तुम्हाला ज्या आवडतात - तुम्ही रचलेल्या कविता सुद्धा - ज्या सगळ्यांना ऐकायला आवडतील अशा कविता. वाचुया, ऐकुया!

तुम्हाला भाग घ्यायचा असेल, तर या post वर ’प्रतिक्रिया’तून तुमचा email पत्ता कळवा. तुमची माहिती इथे प्रसिद्ध केली जाणार नाही.

भेटूया लवकरच!

गुरुवार, ७ एप्रिल, २०११

दशकाची वाटचाल...

या वर्षी गुढीपाडव्याच्या दिवशी "कला"नं दहाव्या वर्षात पाऊल टाकलं. २००२ मधे सॅन-फ्रान्सिस्को बे एरिआतल्या नाट्यवेड्या मंडळींनी सुरु केलेल्या या चळवळीचं हे दशकी वर्ष.  या निमित्तानी या ब्लॉगचा श्रीगणेशा!

आत्तापर्यंत नाटक, एकांकिका, संगीताचे कार्यक्रम, चित्रपट, कलानंदचे अनेक चर्चा, वाचन, मुलाखती असे १५० हून अधिक कार्यक्रम कलानं सादर केले, यापुढेही करत राहू. या सगळ्यांचा आलेख, माहिती यासाठी कलाचं संकेतस्थळ आहेच की:

http://calaaonline.com/

मग ब्लॉग कशासाठी?

ब्लॉग या नाट्यवेड्या मंडळींना एकमेकांशी आणि कलाप्रेमींशी संवाद साधण्यासाठी.  "कला"कारांचं घडामोडींवर भाष्य, कलाविष्कारांवर टीका, कौतुक, चर्चा, नवीन कल्पना, युक्तिवाद या सगळ्याला  ब्लॉगविश्वात प्रकट रुप देणारी ...

कलाभिव्यक्ती!