बुधवार, १९ ऑक्टोबर, २०११

'मराठी रंगभूमीच्या तीस रात्री' : रात्र २


१. पहिली सामाजिक नाटके :रघुनाथ शंकरशास्त्री अभ्यंकर - प्रबोधिक्रया अर्थात स्वैरसकेशा ६३
२. म. बा. चितळे - मनोरमा ७६
... ३. पिहले (भाषांतरित) नाटक : दीनबंधू मित्र/विठ्ठल मोरो वाळवेकर - नीलदर्पण ९२

प्रकरणातील काही भाग-
आपण दुसर्‍या रात्री वेताळटेकडीवर जाऊ तेव्हा लेखक महाराज काही येणार नाहीत, असं धरूनच मी खरंतर टेकडीवर गेलो. पण पाहातो तो काय, लेखक हजर. म्हटलं नाही, मोठी चिवट जात. मी त्याला म्हटलं, अरे वा! माझ्या आधी हजर. काय नवल विशेष? दारूबिरू आहे ना पुरेशी? आणि मॅचचं काय झालं? शेवटचा स्कोअर मला-


तो मला तोडत म्हणाला, ‘स्वैरसकेशा-’ मला काही कळेना. तो जणू माझा उच्छृंखलपणा सहन न झाल्यासारखा वैतागून म्हणाला, स्वैरसकेशा. या नाटकाबद्दल बोलणार होतात. इतर फालतू गोष्टी नकोत. आणि त्यानं बाटली तोंडाला लावली.

मग मी मनात म्हटलं ‘मर’ आणि थेटच विषयाला हात घातला. बहुधा मी काल रात्री इतिहास माहीत नसणं, सकेशा म्हणजे काय ते माहीत नसणं यावरून काही बोललो ते त्याला लागलं असावं. पण तरी तो आला होता. त्याला रस नक्कीच येऊ लागला होता. त्यामुळे मग मी फार विचारण्याच्या फंदात न पडता सरळ सांगायलाच लागलो, ‘स्वैरसकेशा’ या नाटकाचं संपूर्ण नाव, ‘प्रबोधिवद्युत अर्थात स्वैरसकेशा’ नाटिका. ते आलं १८७१ साली आणि त्याचे लेखक होते रघुनाथ शंकरशास्त्री अभ्यंकर. हे मराठीतलं पहिलं सामाजिक नाटक असं अनेक जण मानतात. फुल्यांचं ‘तृतीय रत्न’ लक्षात घेतलं नाही तर ते खरंच आहे. ते काही का असेना, या नाटकापासून एक अत्यंत महत्त्वाचा प्रवाह चालू झाला. तो म्हणजे सामाजिक प्रश्नासंबंधात, त्यातून विशेष करून लिंगभावी राजकीयतेबाबत (gender politics) मांडणी करणार्‍या नाटकांचा.

त्यावेळच्या सामाजिक समस्या होत्या तीन वर्तुळांतल्या. एक जातीय. त्याकडे मराठी उच्चवर्णीय मध्यमवर्गीय रंगभूमी अपवादानंच कधी वळली. दुसरं वर्तुळ होतं धार्मिक सांप्रदायिक संघर्षाचं. त्याकडे मात्र या रंगभूमीनं भरपूर लक्ष दिलं पण ते खूप नंतर. तिसरं वर्तुळ स्त्रीविषयक प्रश्नांचं. त्याकडं मराठी नाटक ‘स्वैरसकेशा’मधून पहिल्यांदा वळलं.
याचं एक कारण असं की, हा विषयच तेव्हा महत्त्वाचा होता. या विषयाचा सखोल अभ्यास आणि चर्चा समाजात चालू होती. त्याही आधी अगदी पेशवाईपासून विशेषतः विधवांच्या प्रश्नावर, थोडे का होईना पण काम झालं आहे, १९३० साली भ्रूणहत्येच्या प्रश्नावर पहिलं पुस्तक आलं होतं, पण रंगभूमी इतर सामाजिक विषयांपेक्षा अधिक प्राथिमकतेनं या प्रश्नांकडे का वळली त्याला इतरही काही महत्त्वाची सामाजिक कारणं आहेत. त्यांतलं एक असं की या मराठी उच्चवर्णीय मध्यमवर्गीय रंगभूमीला जातीयतेविषयी फारसं देणंघेणं नव्हतं, कारण त्या सामाजिक रचनेच्या उतरंडीत हे नाट्यकर्मी वरच्या पायरीवर होते. धार्मिक सांप्रदायिक संघर्ष त्यांच्या जिव्हाळ्याचे, पण ते मुळात उद्भवायला अजून अवकाश होता. मुंबईत पहिला मोठा हिंदू-मुसलमान दंगा झाला तो १८९३ साली.
तत्कालीन स्त्रीविषयक समस्या तीन गोष्टींशी निगडित होत्या. पहिला, बालविवाह आणि त्याचाच उपप्रश्न म्हणजे जरठबाला विवाह; दुसरा, वैधव्य आणि तिसरा स्त्रीशिक्षण. यांतील बालविवाह आणि स्त्रीशिक्षण यांपेक्षा लेखकांचं लक्ष विधवांच्या प्रश्नाकडे आधी वळलं. का? उघड आहे. लेखक पुरुष होते. या प्रश्नाचा संबंध भयानक वाढलेल्या नैतिक भ्रष्टाचाराशी होता. आणि तो स्वार्थाच्या दृष्टीने त्यांना, स्त्रियांवर होणार्‍या अन्यायापेक्षा, स्वाभाविकपणे फार जवळचा होता.

***

'स्वैरसकेशा’ नाटक आलं १८७१ साली. म्हणजे फुल्यांनी विधवांसाठीचा आश्रम काढला त्यानंतर तीन वर्षांनी, आणि विधवा विवाह कायद्यानंतर पंधरा वर्षांनी. नाटक मूलतः विधवांच्या तत्कालीन प्रश्नांची मांडणी करतं. पण त्यामागची जीवनदृष्टी मात्र अत्यंत सनातनी, पुरुषसत्ताक चौकटीतून उद्भवणारी अशी आहे.

हे समाजिचत्र लेखक मांडतो. ते फार भयानक आहे हे सांगतो. विधवांवर होणार्‍या भीषण अन्यायाचं दर्शन घडवतो. या सगळ्यासाठी जबाबदार कोण? पुरुष? छे, पुरुष असे असणारच. जबाबदार आहेत त्या आपलं वैधव्य मान्य करून, सनातनी पद्धतीनं केशवपन करण्याचं नाकारणार्‍या, स्वैर वर्तणूक करणार्‍या आणि पुरुषांच्या अशा वागण्याला खत पाणी घालणार्‍या विधवा. म्हणून तर नाटकाचं नाव ‘स्वैरसकेशा’, ‘स्वैरपुरुष’ नव्हे! आणि यावर उपाय? विधवांनी सनातनी पद्धतीने ‘मर्यादेत’ वागणं.
नाटकातली ही अन्यायाची वर्णनं आणि लेखकानं केलेला नैतिक जबाबदारीचा निर्णय यांत इतका विरोधाभास आहे की कधीकधी लेखकाचा आणि आपला दोघांचाही गोंधळ उडतो! त्याचं उघड कारण म्हणजे लेखकाला विधवांवरचा अन्याय तर स्पष्ट दिसतो आहे, त्याविषयी तो खरोखर मनापासून व्यथित आहे. पण हा अन्याय सनातनी पुरुषसत्ताक पद्धतीतून उद्भवतो हे काही गडी मान्य करायला तयार नाही.

- मकरंद साठे
प्रकाशक: पॉप्युलर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा