सोमवार, २४ ऑक्टोबर, २०११

'मराठी रंगभूमीच्या तीस रात्री' : रात्र ४


लेखक : मकरंद साठे
प्रकाशक : पॉप्युलर

अनुक्रमणिका
१. दुसरा कालखंड, १८८० ते १९३० - प्रास्ताविक १३३
२. संगीत रंगभूमीची सुरुवात
अण्णासाहेब किर्लोस्कर - सं. शाकुंतल व सं. सौभद्र १४२
... ३. सुरुवातीची सनातनी व सांस्कृतिक राष्ट्रवादी गद्य नाटके
नारायण बापूजी कानिटकर - तरुणी शिक्षण नाटिका १६०
४. नारायण बापूजी कानिटकर - सम्मतीवयाचा कायदा १८३
५. सुधारकी सामाजिक नाटके : गोविंद बल्लाळ देवल - सं. शारदा १९२

ही चौथी रात्र होती. आता आम्ही प्रवेश करणार होतो त्या काळाला मराठी नाटकाचा सुवर्णकाळ वगैरे म्हणतात. तेव्हा आता मोठीच मौज येणार होती. मी सांगायला लागलो-
तर साल १८८०. तेथून, म्हणजे त्याच्या आसपास, या कालखंडाची सुरुवात मानायला हरकत नाही. कोणास ती चारदोन वर्षं इकडेतिकडे वाटत असल्यास त्याने तसं मानण्यास आमची यत्किंचितही हरकत नाही.

तर १८८० नंतर सुरुवातीला युग येणार होतं ते नाट्यतंत्रातल्या आणि कलात्मक सुधारणेचं. आता नाटकाचं केंद्र पुणे, मुंबईत स्थिरावलं. रंगभूमी अर्थातच ब्राह्मणी, पुरुषी, नागर, मध्यमवर्गाच्याच ताब्यात होती. तशी ती आजतागायत काही अपवाद वगळता आहेच. इंग्रजी वाङ्मयावर पोसलेलं या वर्गाचं मन आधी कलात्मकतेकडे, त्याच्या सफाईदारपणाकडे- refinement कडे- वळलं. वास्तविक जीवनातल्या राजकारणात, १८८० पावेतो वसाहतिक राजवटीचं स्वरूप अभिजनांच्या लक्षात येऊ लागलं होतं. आता केवळ ‘आपली सत्ता गेली यावरचा राग’, यापुरतं ते मर्यादित नव्हतं, तर साम्राज्यवादी सत्ता ही व्याख्येनेच पिळवणूक करणारी असते, याचं थोडं भान येऊ लागलं होतं. इंग्रजी शिक्षणातून निव्वळ आधुनिक ज्ञानाबद्दल अचंबा आणि त्यांचं अनुकरण वा अंधानुकरण एकीकडे किंवा सनातनी वृत्तीनं हे ज्ञानच नाकारणं दुसरीकडे, या दोन सुरुवातीच्या प्रतिक्रीयांच्या पलीकडे जाऊन, या ज्ञानातूनच तत्कालीन जगाला भिडू शकेल अशी जीवनदृष्टी तयार होऊ लागली होती. पण संपूर्ण स्वातंत्र्यासाठीची चळवळ अजून बरीच लांब होती. कॉंग्रेसची स्थापना व्हायलाही पाच वर्षं बाकी होती, कॉंग्रेसनं स्वातंत्र्याच्या मागणीकडे वळायला तर बराच अवकाश होता. पण अर्ध्यामुर्ध्या स्वातंत्र्यासाठीची चळवळ किंवा त्या बाबतीतली जाणीव मात्र तीव्र होऊ लागली होती. त्याचे पडसाद नाटकात उमटायलाही काही काळातच सुरुवात झाली. कलात्मक ढोबळता गेली तशी तात्त्विक ढोबळताही कमी होऊ लागली.
***

‘सं. शाकुंतल’ आणि ‘सं. सौभद्र’ या दोन नाटकांना एकत्र घेण्याचं कारण असं की त्यांच्या मागची जीवनदृष्टी एकच आहे. दोन्हींच्या आशयवस्तूत सामाजिक, राजकीय संघर्ष नसूनही आपल्यासाठी ती महत्त्वाची आहेत. या काळातली नाटकं प्रखरपणे राजकीय होती असं आपण म्हटलं, पण या कालखंडाची सुरुवात झाली ती कलात्मक मांडणी प्रगल्भ आणि सफाईदार होण्यातून. तसा या नाटकांचाही विषय पौराणिकच आहे. आणि आधीच्या नाटकांच्या अस्तित्वामागची सामाजिकता/राजकारण यांचा अर्थ जसा लावता येतो तसाच किर्लोस्करी नाटकांची मांडणी तपासली, व्यवहार तपासला तर त्यांचाही लावता येतो. आणि ते आपल्यासाठी महत्त्वाचं.

आपण म्हटलं की १८८० पर्यंत नाटक हळूहळू पुणे मुंबईत केंद्रित होऊ लागलं होतं. किर्लोस्करांचा जन्मही धारवाडचाच, पण त्यांनी नाटक केलं पुण्यात येऊन. ‘शाकुंतल’ नाटक आलं १८८० साली आणि ‘सौभद्र’ आलं १८८२ साली. या नाटकांद्वारे वरच्या वर्गाचं/वर्णाचं नाटक कलात्मक प्रगल्भतेच्या पुढच्या पातळीला पोचले. एका अर्थी अभिजात - classical - झालं. भाषासौष्ठव, पात्र हाताळणी, नाट्यमयता आणि नाट्यतंत्र, सहजसोपे स्वाभाविक संवाद, सगळ्याच बाबींत या नाटकांनी पुढचा पल्ला गाठत एक मापदंडच- बेंच मार्कच- तयार केला. पण त्यातही सर्वांत अधिक महत्त्वाचं म्हणजे त्यातला संगीताचा वापर.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा