गुरुवार, १७ नोव्हेंबर, २०११

'मराठी रंगभूमीच्या तीस रात्री' : रात्र ५

 
लेखक : मकरंद साठे
प्रकाशक : पॉप्युलर

1.राजकीय नाटकांची सुरुवात : शंकर मोरो रानडे ‘अधिकारदान विवेचना अथवा स्थानिक स्वराज्याविषयी वाटाघाट’ २०९
२. वा. र. शिरवळकर - राणा भीवदेव अथवा खरा रजपूत,
भा. ह. पटवर्धन - रणसिंह आणि बकुळा अथवा प्राचीन राजक्रांतीचे चित्र २१६
... ३. टिळक व मराठी नाटक २२३


‘अधिकारदान विवेचना अथवा स्थानिक स्वराज्याविषयी वाटाघाट’ या नाटकाच्या अगदी पहिल्याच पानावर एक पद आहे. तसं ते नाट्यबाह्यच आहे खरंतर. अशी पद्धतच होती. लेखक आपल्याला काय म्हणायचं आहे ते कधीकधी अशा पद्धतीनं स्पष्टच करून टाकत असे. ‘तरुणी शिक्षण नाटिका’ मधे नाही का आपण महाभारत आणि मनुस्मृतीतले उतारे दिलेले पाहिले, तसंच हे, पद पाहण्यासारखं आहे. -

‘‘कशास व्हावे जीवन मनुजा स्वातंत्र्यभावी?
आयुष्याची व्यर्थ क्रमणा श्रमद आदरावी?॥
विश्व असे हा तुरुंग मोठा, प्राणीमात्र कैदी!
पदार्थधर्माचीया शृंखला- त्या व कुणी भेदी!
तरी अन्यमानवेच्छेपुढे करणे नमनादि-
याहुन दुसरी जिवन्तकारस्थिती नचि वर्णावी!

दुसरं महत्त्वाचं म्हणजे, या काळातील जवळ जवळ प्रत्येक नाटकाला प्रस्तावना असे. एका प्रकारे तो लेखकाचा मॅनिफेस्टोच, जाहीरनामाच असे. काही सामाजिक, राजकीय भूमिका असणार्‍यांना तो अनेकदा आवश्यक वाटतो. याबाबत स्वातंत्र्यानंतरच्या मध्यमवर्गीय नाटकासंबंधात काय स्थिती आढळते ते बघण्यासारखं आहे. या काळातल्या गो. पुं. देशपांडे यांच्या जवळजवळ सगळ्याच आणि तेंडुलकरांच्या सुरुवातीच्या काही नाटकांचा अपवाद वगळता प्रस्तावना अभावानंच आढळतात. यामागची कारणं उघड आहेत. या काळातल्या इतर लेखकांना सामाजिक, राजकीयदृष्ट्या आपला मॅनिफेस्टो काढावासा वाटत नाही. हे चांगलं का वाईट का व्यामिश्र ते आपण तिथंपर्यंत आल्यावर बघूच. सध्या याची नोंद मात्र घेऊन ठेवू.

तर परत ‘अधिकारदान विवेचना’. या नाटकाच्या प्रस्तावनेत लेखक म्हणतो- ‘स्थानिक स्वराज्यासंबंधाने वर्तमानपत्रातून लेख सांप्रत जारीने प्रसिद्ध होत आहेत... हे नाटक लिहिण्याचा आमचा हेतू एवढाच की महत्त्वाच्या विषयाचे स्वरूप, आमच्या बंधूजनांस करमणुकीच्या वाटेने राहून कळावे, व त्यायोगे आजचा प्रसंग केवढा आणीबाणीचा आहे हे त्यांस पुरतेपणी कळून त्यांनी स्थानिक स्वराज्यसंबंधाची योग्यता आपल्या अंगी आणण्यास यथाशक्ति झटण्यास आळस करू नये....

‘...उत्तम नाटके योग्य पात्रांकरवी रंगभूमीवर करण्यात आली असता ती ज्याप्रमाणे देशस्थिती सुधारण्यास हेतुभूत होऊ शकतात, त्याचप्रमाणे रसाळ हरिदासांकडून सुबोधपर कीर्तने करण्यात आली असता तीही देशस्थिती सुधारण्यास कारणीभूत होतात. यासाठी प्रस्तुत नाटकात शेवटल्या प्रवेशात प्रत्यक्ष रंगभूमीवर देशस्थिती संबंधाचे कीर्तन घालण्यात आले आहे....’

प्रस्तावना वाचली की आपण आधी पाहिल्याप्रमाणे या काळी हाय कल्चर, लो कल्चर किंवा उच्चभ्रू संस्कृती आणि लोकसंस्कृती यांत भेद किती कमी होता ते परत जाणवतं. तसंच मराठी नाटक केवळ परकीय, ब्रिटिश शैलीवर अवलंबून नव्हतं तर लोककलांचा जागरूक वापरही त्यात किती होत असे तेही जाणवतं. टिळकांनी पुढे ‘राष्ट्रीय कीर्तनाचा’ जो पुरस्कार केला त्याची बीजं यात आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा