गुरुवार, १७ नोव्हेंबर, २०११

'मराठी रंगभूमीच्या तीस रात्री' : रात्र ६

 
लेखक : मकरंद साठे
प्रकाशक : पॉप्युलर

१. पुढच्या टप्प्यावरील राजकीय नाटके :
कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर - प्रास्ताविक २३१
२. कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर :
... सवाई माधवराव यांचा मृत्यू, कीचकवध, भाऊबंदकी २३६
३. दुसर्‍या टप्प्यावरची सांस्कृतिक राष्ट्रवादी नाटके :
दामोदर विश्वनाथ नेवाळकर - तारक मारक, दंडधारी, धर्मरहस्य २५५


तर शेवटी आपण या राजकीय नाटकांचा सुवर्णकाळ असं ज्याचं वर्णन करतात त्या कालखंडातल्या सर्वोच्च बिंदूपर्यंत, म्हणजे खाडिलकरांपर्यंत एकदाचं येऊन पोचलो. आता खरी मजा. खाडिलकरांची नाटकं म्हणजे राजकीय वैचारिक प्रगल्भता, तसंच तोपर्यंत वाढत गेलेल्या कलात्मक उंचीचा वारसा - यांचा संगम.
खाडिलकरांचा जन्मही सांगलीचाच! हा मोठाच योगायोग आहे. याची सामाजिक, राजकीय कारणमीमांसा वगैरे करण्याचा मी मरेस्तोवर प्रयत्न केला. पण काहीही हाताशी आलं नाही! तेव्हा हा मोठाच योगायोग असं म्हणून मोकळं व्हावं हे बरं.

या काळातले सर्वच नाटककार टिळकभक्त होते हे आपण पाहिलंच. पण खाडिलकर राजकीय कार्यकर्ता म्हणूनही आणि पत्रकार, सहकारी म्हणूनही टिळकांच्या अत्यंत निकटच्या वर्तुळातले होते. कर्झनशाहीच्या जुलमाच्या पराकोटीच्या काळात टिळकांनी त्यांना शस्त्रनिर्मितीचा अभ्यास करण्यासाठी नेपाळला पाठवलं होतं, असं म्हणतात. हे ब्रिटिशांना उशिरानी कळलं. पण त्यानंतर ब्रिटिश पोलिसांची खाडिलकरांवर विशेष नजर असे, अशा नोंदी ब्रिटिश पोलिसांच्या फायलीत आढळतात. त्यांच्या नाटकावरही ब्रिटिश विशेष लक्ष ठेऊन असत आणि त्यावर त्यांनी बंदीही आणलीच. ते आपण पुढे बघूच.

केसरीचे उपसंपादक म्हणूनही खाडिलकर अत्यंत जहाल वसाहतवादविरोधी ‘संपादकीय’ लेख लिहीत. किंबहुना टिळकांना १९०६ साली राजद्रोहासाठी ६ वर्षे काळ्यापाण्याची भीषण शिक्षा ज्या आठ लेखांमुळे झाली, त्या लेखांपैकी पाच लेख प्रत्यक्षात खाडिलकरांनी लिहिले होते. टिळकांनी त्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून ही शिक्षा पत्करली! आज पटकन् माफी मागणारे लेखक व संपादक पाहता - पण ते जाऊ द्या.

खाडिलकरांची नाटकं किती प्रभावी होती ते कळण्यासाठी एका घटनेचा उल्लेख करणं आवश्यक आहे. इंडियन प्रेस ऍक्ट हा सेन्सॉरविषयक कायदा केला जावा असं अनेक ब्रिटिश अधिकार्‍याचं मत होतं. पण जॉन मोर्लेनी त्यांच्या उदारमतवादी विचारसरणीला जागून तो बराच काळ होऊ दिला नव्हता. हा इंडियन प्रेस ऍक्ट शेवटी १९१० मध्ये पास झाला. आणि त्यामागे ‘कीचकवध’ या खाडिलकरांच्या नाटकाशी संबंधित अशा घटना होत्या. ते आपण अधिक डिटेलवारीनं नंतर पाहणारच आहोत. यानंतर ब्रिटिश सरकार हात धुऊन वर्तमानपत्रांच्या मागे लागलं आणि आपण हजर नसताना केसरी चालू तरी राहावा म्हणून टिळकांनी तुरुंगातून त्याची सूत्रं जहाल खाडिलकरांऐवजी मवाळ केळकरांकडे सोपवली, ही आयरनी!
खाडिलकरांनी नाट्यव्यवहार हा राष्ट्रवादी चळवळीचा अविभाज्य भागच बनवला. ...केतकरी कादंबरीत जी वैचारिक उंची, रूपबंधात्मक प्रयोगशीलता दृष्टीस पडते, ती प्रथम खाडिलकरी नाटकात दृष्टीस पडते. खाडिलकर पत्रकार होते, तुरुंगवास भोगलेले स्वातंत्र्यसेनानी होते. उपनिषदांचे अभ्यासू समीक्षक होते. त्यामुळे खाडिलकरी नाटकात एका जीवनदृष्टीची साक्ष पटते... भाऊबंदकी आणि कीचकवधासारख्या गोष्टी एरवी नुसत्या आख्यान होऊन उरल्या असत्या. खाडिलकरी नाटकांत या गोष्टींना समकालीन राजकीय अर्थ प्राप्त होतात, आख्यान परंपरेचा इतका समर्थ आणि समकालीन माहात्म्य असलेला उपयोग फार थोडे लेखक करू शकतात... नाटकाद्वारे लेखकाला एक विचार प्रसारित करता येतो व ते त्याने केले पाहिजे, अशी भूमिका असणारे खाडिलकर पहिले भारतीय नाटककार असावेत. पहिले ‘डायडॅक्टिक’ नाटककार असेही म्हणता येईल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा